Site Logo
वाशिम जिल्हा

फुलउमरीत पुन्हा ग्रामसभा घेण्याची गावकऱ्यांची मागणी घरकुल योजनेपुरतीच चर्चा झाल्याचा आरोप; शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन

प्रकाशित: 28 Aug 2026, 01:16 PM
259 Views
Featured News Image

मानोरा :  पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या फुलउमरी ग्रामपंचायत कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेच्या कामकाजावरून गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सचिव व प्रशासक यांच्या अनुपस्थितीत रोजगार सेवकांनी ग्रामसभा घेतल्याने गावकऱ्यांनी या ग्रामसभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, गावातील महत्त्वाचे विषय चर्चेला न आल्याने पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सचिव गबर आडे यांनी ग्रामसभेवर बहिष्कार असल्यामुळे आपण ग्रामसभेला उपस्थित राहिलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सचिवांच्या अनुपस्थितीमागील भूमिका आता स्पष्ट झाली आहे.

२४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेबाबत चर्चा झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गावातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच इतर महत्त्वाचे विषय ग्रामसभेत चर्चेला घेण्यात आले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी २७ ऑगस्ट रोजी गावकऱ्यांनी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना निवेदन देऊन त्यांच्या उपस्थितीत पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली. ग्रामसभेत गावातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा व्हावी आणि नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर रामेश्वर केशव राठोड, जगदीश पवार, डॉ सचिन राठोड,किशोर चव्हाण, चेन्नसिंग राठोड,अनुप राठोड, पवन राठोड,उमेश राठोड, जगदीश राठोड यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामसभेच्या निमित्ताने प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे फुलउमरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: