Site Logo
वाशिम जिल्हा

संजय भानावत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांनी उपलब्ध करून दिला निधी, भूमिपूजन उत्साहात संपन्न

प्रकाशित: 26 Jul 2026, 12:21 PM
8 Views
Featured News Image

फुलउमरी, प्रतिनिधी :

स्वातंत्र्य मिळून तब्बल ७९ वर्षे उलटल्यानंतर अखेर फुलउमरी गावाला पहिल्यांदाच स्वतंत्र स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय भानावत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकारातून अनिल देशमुख यांनी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर नुकतेच स्मशानभूमीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.

फुलउमरी हे मोठे गाव असूनही आजपर्यंत गावाला स्वतंत्र स्मशानभूमी नव्हती. त्यामुळे एखाद्या नागरिकाचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल, रस्त्यांची गैरसोय आणि जागेअभावी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक छोट्या गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा असताना फुलउमरीसारख्या मोठ्या गावात ही मूलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.

ही समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय भानावत, परेश राठोड, सामील राठोड, माजी सरपंच मंगल चव्हाण, बाबुराव चव्हाण आणि पोलीस पाटील वसंत राठोड यांनी धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच भाजपा प्रदेश सहसंयोजक तथा युवा नेते भक्तराज महाराज यांची भेट घेऊनही ही मागणी प्रभावीपणे मांडण्यात आली. या प्रयत्नांना अखेर यश आले आणि स्मशानभूमीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

भूमिपूजन सोहळ्याला विजय पवार, इंदल काळे, सुरेश राठोड, सुधीर मनवर, सुरेंद्र मनवर, दत्ताराम राठोड, तुकाराम राठोड, सुभाष हिरासिंग राठोड, श्रीराम भुरके, प्रकाश चव्हाण, प्रेमसिंग चव्हाण यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत संबंधितांचे आभार व्यक्त केले.

 सौंदर्यीकरणासह मूलभूत सुविधांची अपेक्षा

स्मशानभूमीचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसराचे सुशोभीकरण, अंतर्गत रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत दिवे, संरक्षक कंपाऊंड, वृक्षारोपण, बसण्याची व्यवस्था आणि अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या सुविधांमुळे स्मशानभूमी अधिक सुसज्ज होऊन नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय कायमची दूर होईल.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: