Site Logo
महाराष्ट्र

गुरुपौर्णिमेला तीन दिवस १०० रुपयांत प्रवेश; पुन्हा २०० रुपये शुल्क सुरू होताच महंतांचा एल्गार – भाविकांवरील आर्थिक भार कमी करण्याची मागणी

प्रकाशित: 04 Aug 2026, 11:30 AM
144 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी  :

देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील जगविख्यात बंजारा ए विरासत म्युझियम पाहण्यासाठी दररोज हजारो भाविक व पर्यटक येत असतात. बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि वारसा जवळून अनुभवता यावा, या उद्देशाने भाविक मोठ्या उत्साहाने म्युझियमला भेट देतात. मात्र, प्रति व्यक्ती २०० रुपयांचे प्रवेशशुल्क असल्याने सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची भावना भाविकांतून व्यक्त होत आहे.

ही बाब लक्षात घेऊन महंत कबीरदास महाराज आणि महंत जितेंद्र महाराज यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सलग तीन दिवस प्रवेशशुल्क १०० रुपये करण्यात आले होते. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले होते.

मात्र, सवलतीचा कालावधी संपताच संबंधित कंपनीकडून पुन्हा २०० रुपये प्रवेशशुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, प्रवेशशुल्क कायमस्वरूपी १०० रुपये करण्यात यावे, अशी मागणी महंतांकडून करण्यात आली आहे.

या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास आज (४ ऑगस्ट) म्युझियमच्या मुख्य प्रवेश दाराला ताला ठोक आंदोलन' करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्युझियम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्वसामान्य भाविकांना परवडणारे प्रवेशशुल्क ठेवून बंजारा समाजाचा ऐतिहासिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, अशी मागणी भाविकांमधून जोर धरत आहे. आता प्रशासन आणि संबंधित कंपनी यावर कोणता निर्णय घेते, याकडे राज्यभरातील बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: