Site Logo
विदर्भ

३१ जुलैनंतर पावसात खंड; तणनाशक फवारणी, आंतरमशागत रखडली, किडीच्या प्रादुर्भावाने चिंता वाढली

प्रकाशित: 06 Aug 2026, 02:56 PM
118 Views
Featured News Image

मानोरा प्रतिनिधी : तालुक्यात ३१ जुलै रोजी झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. पावसात सातत्य नसल्याने तणनाशक फवारणी, आंतरमशागत आणि इतर शेतीची कामे अनेक ठिकाणी अपूर्ण राहिली आहेत. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने मंगळवार व बुधवारी मानोरा  तालुक्यासह जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पावसावर खिळल्या आहेत.

गत आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तालुक्यात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे नदी-नाले वाहते झाले,  आणि कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतीची कामे पुन्हा ठप्प झाली आहेत.

कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या जोमदार वाढीसाठी सध्या नियमित पावसाची आवश्यकता आहे. वाढत्या उन्हामुळे वातावरणातील उष्मा वाढत असून त्याचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. पेरणीनंतर अल्पावधीतच हुमणी अळी व किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी धास्तावले असून अनेकांनी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. कृषी विभागानेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तालुक्यात व्यापक पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून, आता त्यांच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत.

Author

पोहरादेवी दर्शन

लेखक / संपादक

Poharadevi Darshan News

ही बातमी शेअर करा: